यंदाचा गणेशोत्सव म्हणजे गणेश मंडळांसाठी तारेवरची कसरत,पाळावे लागतील हे नियम
यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव ज्या थाटात साजरे होतात त्या थाटात होणार नाही. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र, यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीची उंची कमी असणार आहे. पण त्याचबरोबर मंडळांना अनेक नियमांचे काटेकोर पालनही करावे लागणार आहे भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. तसेच हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन या कार्यक्रमांना फक्त १० कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहता येणार आहे.
मुंबईत साडेबारा हजारांच्या जवळपास गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव पूर्णत्वास नेणे ही तारेवरची कसरत असणार आहे. सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात गर्दी झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
‘हे’ आहेत गणेशोत्सव मंडळांसाठी नियम?
- मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत.
- मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.
- मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून 3 वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे.
- मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.
- आरतीला मंडपात जास्तीत जास्त १० कार्यकर्त्यांना प्रवेश असेल.
- आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही.यावेळी देखील केवळ १० कार्यकर्तेच सहभागी होऊ शकतील.
- मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावेत. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध घालण्यात आले आहे..
- भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक आरोग्याचे आयोजन करता येणार नाही.
- कमीत कमी निर्माल्य तयार व्हावे याची काळजी घ्यावी.
- ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून कोरोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असणार आहे.