मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवा दरम्यान फेरीवाल्यांना बंदी घाला
नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्वच उत्सव, सण यावर मर्यादा आल्या आहेत. यावर्षी श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव सर्व मोरया भक्त, देवस्थान, ग्रामस्थ, महापालिका साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात फिरते व्यापारी, विक्रेते यांना उत्सव काळात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवदेन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, कोरोना महामारीमुळे यंदा महासाधू श्री मोरया गोसावी यांचा 459 वा संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. दर चतुर्थी व महोत्सवात बाहेरील गावावरून उत्सवामध्ये फिरते व्यापारी, विक्रेते श्री मोरया मंदीर रस्ता, गोखले आळी, चिंचवडे आळी, पडवळ आळी, गांधी पेठ पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टॉल लावतात. खरेदी-विक्री भर रस्त्यावर चालते.
या फिरत्या विक्रेत्यांमुळे भाविक भक्तांना चालता देखील येत नाही. हे विक्रेते रस्त्यावर प्लॅस्टिक व कचऱ्याचा खच तसाच टाकून जातात. यावर्षी मोठे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. यामुळे भाविक-भक्तांचे दर्शन सुरळीत व सोशल डिस्टन्सिंग राखून होण्यासाठी फिरत्या विक्रेत्यांना चिंचवडमध्ये उत्सव काळात येण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका चिंचवडे यांनी केली आहे.