मुलगा विवाहितेसोबत पळाल्यानंतर वडिलांची हत्या
मुलाच्या प्रेमसंबंधांमुळे वडिलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. सय्यद इस्माईल असे मृत रिक्षा चालकाचे नाव असून मागच्या १९ नोव्हेंबरपासून ते बेपत्ता होते. तांबाराम-नेमिलीचेरी मार्गावरील थिरुमुदीवाक्कम येथील झुडूपात सय्यद यांचा मृतदेह सापडला. सुरेंद्रन (३२) आणि त्याचा मित्र बालाजी (३३) दोघांनी मिळून सय्यद इस्माईलची हत्या केली.
सय्यदचा मुलगा अझरुद्दीनचे सुरेंद्रनची पत्नी सुमतीबरोबर अनैतिक संबंध होते. महिन्याभरापूर्वी सुमती अझरुद्दीनबरोबर पळून गेली. पत्नी सुमती अझरुद्दीन बरोबर पळून गेल्यानंतर सुरेंद्रनने बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्याने मित्र बालाजीशी संपर्क साधला. बालाजीची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. दोघांनी मिळून अझरुद्दीनला संपवण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे दोघे तांबाराम येथे गेले व अझरुद्दीनची वाट पाहत थांबले होते.
अझरुद्दीन घरी फिरकलाच नाही. पण त्याचे वडिल इस्माईल त्यांना दिसले. त्यांनी अझरुद्दीनपर्यंत पोहोचण्यासाठी इस्माईलचे अपहरण करण्याचा कट रचला. ग्राहक म्हणून सुरेंद्रन आणि बालाजी इस्माईल यांच्या रिक्षात बसले. रिक्षा सुरु होताच त्यांनी इस्माईल यांच्याबरोबर भांडण उकरुन काढले. त्यानंतर त्यांनी रिक्षातच इस्माईल यांची गळा आवळून हत्या केली व मृतदेह झुडूपात टाकून तिथून पसार झाले.
इस्माईल १९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांनी २० नोव्हेंबरला तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. सोमवारी सुरेंद्रन आणि बालाजीने साईदापेठ कोर्टात आत्मसमर्पण करुन गुन्ह्याची कबुली दिली.