मुख्यमंत्र्याच्या घोषणेमुळे प्रश्न सुटत नसतो; चंद्रकांतदादांनी टोचले स्थानिक नेत्यांचे कान
- नवनगर प्राधिकरणातील बाधित शेतक-यांच्या साडेबारा टक्के परताव्यांचा प्रश्न
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनीचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न सुटला, म्हणून स्थानिक भाजप नेत्यांसह पदाधिका-यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्या आनंदावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवारी) झालेल्या बैठकीत विरर्जन टाकले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेबारा टक्के परतावा देण्यास तत्वता मान्यता दिली. परंतू, त्याचे प्रशासनला इतिवृत्त दयावे लागते. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हणून लगेच प्रश्न सुटला असे कधीच होत नसते, असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्थानिक भाजप नेत्यांसह पदाधिका-यांना कान टोचले आहेत.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) कामाचा आज (शुक्रवारी) पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीसीएनटीडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, नवनगर विकास प्राधिकरणाने 1974 मध्ये भुसंपादन केले. शेतक-यांना केवळ 1 रुपया दराने मोबदला दिला. आता एकरी साडेबारा टक्के मोबदला, तसेच जमिनीचा मोबदला चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचे दोन पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याला तत्वत: मान्यता दिली आहे.
याप्रसंगी 1984 साली भूसांपदन केलेल्या काही बाधित शेतक-यांना मोबदला दिल्याचे प्राधिकरणाचे सीईओ प्रमोद यादव यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी म्हटले म्हणजे प्रश्न सुटला असे होत नाही. त्याचे कुठेही इतिवृत्त आलेले नाही. प्राधिकरणकडे प्रशासनाला मिटींगचे मिनिंट्स द्यावे लागेल. त्याला मंत्रीमंडळाची मान्यता घ्यावी लागेल. त्यानंतर अध्यादेश निघेल. त्यामुळे केवळ मुख्यमंत्र्यांनी तत्वता मान्यता दिल्याने लगेच प्रश्न सुटणार नसल्याचेही पाटील यांनी सांगत दोन्ही आमदारांचे कान टोचले.