मुख्यमंत्र्याचं बोलणं म्हणजे लबाडाच्या घरचं आवतण – शरद पवाराची टीका
रत्नागिरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं, वागणं हे लबाडाच्या घरचं आवतण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. रविवारी संध्याकाळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 55 व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.
एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ, धनगर समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. अशी अनेक आश्वासनं दिली, मात्र त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. यावेळी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवताना त्यांनी लबाडाच्या घरचं आवतण कसं असतं याचं उदाहरणही दिलं, त्यामुळे एकच हशा पिकला.
शरद पवार म्हणाले की, तीन वर्षापूर्वी तुमच्या अधिवेशनाला आले, सातवा वेतन आयोगाचं घोषणा केल्या, अप्रत्यक्षपणे तुम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून मान्य केलं, अनेक आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यांचं वागणं, बोलणं हे लबाडाच्या घरचं आवतण आहे. आज महाराष्ट्राची सूत्रं अशा प्रवृत्तीच्या हातात येत असेल, तर तुम्हाला, मला आणि महाराष्ट्रातील जनतेला एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले.