मुख्यमंत्र्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम, विधानसभा अध्यक्षपदाबाबत उदय सामंत यांचे वक्तव्य
नागपूर – काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा काल राजीनामा दिला. नाना पटोलेंची काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. मात्र त्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदी कोण बसणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष नाराज असल्याचे देखील बोलले जात आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दावेदारी केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.आता विधानसभा अध्यक्षपदाबाबत शिवसेना नेते आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारले असता, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे. सामंत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील, त्यांचा शब्द शिवसैनिकांसाठी अंतिम असेल.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहिल्यास यापदासाठी सुरेश वारपूडकर, अमीन पटेल आणि आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी ही नावे चर्चेत आहेत.