मुंबई,नवी मुंबई, ठाण्यासह कोकणात रविवार पासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
मुंबई सह उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसानं काही दिवस विश्रांती घेतली असली तरी पुन्हा एकदा पावसानं कमबॅक करत मुंबईकरांना चागंलच झोडपून टाकलं आहे. त्यात आता रविवार म्हणजे 2 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह कोकणात रविवार पासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि 4 ते 5 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तसंच पुढील 24 तासांतही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण या भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
=
काल सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची रिपरिप सुरु होती. पावसाचा जोर पुढील 24 तास कायम राहणार असा अंदाज होता. तर आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे मुंबईकरांसह राज्यातील नागरिक सुखावले आहेत.