मानससरोवर यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा
नवी दिल्ली – कैलास मानस सरोवर यात्रेच्या पहिल्या तुकडीला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय विदेश राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी या तुकडीला निरोप दिला. हिमालयाच्या दुर्गम भागातून जाणारी ही यात्रा सुखरूप पार पडू दे अशा शुभेच्छा त्यांनी यात्रेकरूंना दिल्या. यात्रेकरूंनी शारीरीक तंदुरूस्ती कायम राखून धैर्याने ही यात्रा पुर्ण करावी व यशस्वी होऊनच तेथून परत यावे अशी मनोकामनाहीं त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यंदाच्या मानस सरोवर यात्रेला एकूण 1500 भारतीय जाणार असून त्यातील ही पहिली तुकडी 60 यात्रेकरूंची आहे. यंदाच्या यात्रेसाठी एकूण 3734 अर्ज आले होते. 60 जणांच्या अठरा तुकड्या लिपुलेक मार्गे तर प्रत्येकी 50 यात्रेकरूंच्या दहा तुकड्या नथुला पास मार्गे मानस सरोवराला जाणार आहेत. लिपुलेक मार्गाच्या यात्रेचा कालावधी 24 दिवसांचा आहे. तर नथुला पास मार्गे ही यात्रा करायला 21 दिवस लागतात. यंदाच्या यात्रेकरूंच्या समवेत दोन अनुभवी संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. यात्रेकरूंसाठी गृह मंत्रालय व संरक्षण मंत्रालयही मदत करीत असते.