माता रमाई यांनी शोषित, वंचितांसाठी केलेले कार्य दिपस्तंभासारखे – महापौर माई ढोरे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांनी शोषित वंचितांसाठी केलेले कार्य दिपस्तंभासारखे असून त्यांनी आपल्या कर्तृत्वातून समाजाला उभारी दिली. स्वार्थापेक्षाही त्यागाला अधिक महत्व असते याचा आदर्श त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांनी उभा केला असून आपण सर्वांनी त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.
रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महापौर ढोरे बोलत होत्या. शहरातील विविध संघटनाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमावेळी महापौर ढोरे यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माता रमाई यांचा जयंतीदिन आणि स्मृतीदिन शासकीय अधिकृत कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावा या शहरवासियांच्या मागणीला पाठिंबा देत याबाबत महापालिकेच्या वतीने शासनाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन महापौर ढोरे यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमास नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, सम्यक विदयार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड, नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीष वाघमारे, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, एकता कर्मचारी संघटनेचे तुकाराम गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
माता रमाई यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याची कार्यवाही सुरु असून त्या बाबत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ दिली. प्रतिकूल परिस्थितीत त्या कणखरपणे बाबासाहेबांना साथ देत होत्या. कौटूंबिक जबाबदारीसह त्यांनी सामाजिक जबाबदारीही समर्थपणे पेलल्याने बाबासाहेबांना सामाजिक क्रांतीचा लढा उभा करणे सहज शक्य झाले. असे नमूद करुन महापौर ढोरे यांनी माता रमाई यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी सुलक्षणा शिलवंत यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या सावटाखाली देखील नागरीकांनी संयम ठेवून महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम घरीच साजरे करुन अनोखे अभिवादन केले यासाठी त्यांनी नागरीकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष जोगदंड यांनी केले तर सूत्रसंचालन गिरीष वाघमारे यांनी केले तर आभार बापूसाहेब गायकवाड यांनी मानले.