जो सन्मान दलाई लामांना तो शंकराचार्यांना नाही
नवी दिल्ली : देशात गेल्या काही वर्षांपासून सांप्रदायिक ध्रुवीकरण वाढल्याचा हवाला देत जो सन्मान दलाई लामांना दिला जातो. तो सन्मान शंकराचार्यांना दिला जातो का, असा सवाल शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे अनेक लोक आमच्याकडे येतात. पण आम्ही कधी कोणालाही वैयक्तिक कामाबाबत बोलत नाही, असे सांगत काँग्रेसी म्हणून आम्हाला शिवी तर दिली जाते. पण मी काँग्रेसी बनून कोणकोणते फायदे घेतलेत हेही सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी अनेक मुद्यांवर खुलेपणाने चर्चा केली. काँग्रेस समर्थक असल्याच्या आरोप करणाऱ्यांवर आपण नाराज असल्याचे ते म्हणाले. देशात सांप्रदायिक ध्रुवीकरण वाढल्याचे सांगत यामागे धर्म नव्हे तर राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन्ही पक्षांनी समजून घेतले पाहिजे की त्यांचे भांडण कशाबरोबर आहे. मी कोणाबरोबरही भेदभाव करत नाही असे सांगत जो सन्मान दलाई लामांना मिळतो तो शंकराचार्यांना आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळावर आपण निराश असल्याचेही ते म्हणाले.