महाविकासआघाडीच्या शपथविधी सोहळ्याच्या व्यवस्थेवर राज्यपाल कोश्यारी नाराज : सूत्र
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी गुरुवारी (28 नोव्हेंबर) शिवतीर्थावर पार पडला. परंतु या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शपथविधी सोहळाच्या प्रोटोकॉलनुसार व्यवस्था नव्हती, असा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला आहे. शपथविधीदरम्यान मंचावरील अवस्थेवर राज्यपालांनी नाराजी दर्शवली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्यामते, “शपथविधी सोहळ्याच्या प्रोटोकॉलनुसार व्यवस्था नव्हती. शपथविधीची व्यवस्था प्रशासनाला करु दिली नाही, ज्यामुळे मंचावर अव्यवस्था पाहायला मिळाली.” राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्षेपही नोंदवला आहे.
या सोबतच शपथ घेण्याआधी आमदारांनी आपापल्या नेत्यांची नावं घेतली यावरही कोश्यारी नाराज होते. ते म्हणाले की, भविष्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात असं होऊ नये. हे शपथविधी सोहळ्याच्या प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. अशी कृत्ये शपथविधी सोहळ्याची प्रतिष्ठा खालावते.