महाराष्ट्रात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत ७ टक्क्यांनी घट
नवी दिल्ली – कोरोनाचा सर्वाधित फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत ७ टक्क्यांची घट झाली असून याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.
कर्नाटक आणि दिल्लीत आठवड्याला होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत ५० टक्के तर कर्नाटकात ९.६ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. तर महाराष्ट्रात मृत्यू दरात ११.५ टक्क्यांची तर तामिळनाडूमध्ये १८.२ आणि आंध्र प्रदेशात ४.५ टक्क्यांची घट झाल्याचे राजेश भूषण यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातही अॅक्टिव्ह केसेसमध्ये आठवड्याच्या आधारावर १३.७ टक्क्यांची घट झाली आहे. तर कर्नाटकमध्ये १६. तामिळनाडूत २३.९ तर उत्तर प्रदेशात १७.१ टक्क्यांची घट झाल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
सध्या पाच राज्यांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून एकूण उपचार घेत असलेले ६२ टक्के रुग्ण आहेत. तसेच आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्येच एकूण मृत्यूंच्या ७० टक्के मृत्यू झाल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.