मराठा क्रांती मोर्चाेतील तरुणांना पोलिसांच्या नोटीस
औरंगाबाद – मराठा आंदोलनप्रकरणी औरंगाबादमधील मराठा तरुणांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मराठा आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्याप्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांशी संबंधितच या नोटीस आहेत. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील 80 टक्के गुन्हे मागे घेतल्याचे सांगितले होते. तसेच उर्वरीत गुन्हेही मागे घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नोटीस आल्याने मराठा तरुणांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या नोटीस आल्यानंतर मराठा तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित मराठा तरुणांना रस्ता अडवणे, जाळपोळ करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी नोटीस दिल्या आहेत. यात या तरुणांना त्यांच्यावर दंडाची आकारणी व इतर कायदेशीर कारवाई का करु नये, अशीही विचारणा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याची भावना मराठा समाजकडून व्यक्त केली जात आहे.