मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडेंचे आज लाक्षणिक उपोषण, तर खासदार जलील यांची टीका
औरंगाबाद | मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर या उपोषणाला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी हे आंदोलन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने केले जाणार होते. मात्र आता हे आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष जावे म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे म्हणाल्या. उपोषणस्थळी मराठवाडा पाण्यापासून कसा वंचित राहिला आहे, याचे चित्रप्रदर्शन लावण्यात आले आहे. वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प अपूर्ण राहिल्याचही इथे नमूद करण्यात आले आहे. दुपारी साडेतीन वाजता पंकजा मुंडे उपस्थितांना संबोधित करणार आहे.
हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्यांची सत्ता येऊन महिना झाला आहे, त्यामुळे त्यांनी लगेच हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा मी करत नाही, मात्र सत्ताधाऱ्यांचे लक्ष या प्रश्नाकडे जावे म्हणून हे उपोषण असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही हा प्रश्न मी सातत्याने मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते हा प्रश्न सोडवतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.