कोल्हापुरात मुसळधार पाऊस, एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना
कोल्हापूर : जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी पंचगंगेला केवळ दोन फूट बाकी आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फूट २ इंचावर आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत.
परिसरात दिवसभरात सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत,अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली.
यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्या बाबत मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.