मनसे इम्पॅक्ट : विरारमध्ये २३ बांगलादेशींना अटक
मुंबई | मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारत मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर आता बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २३ बांगलादेशींविरोधात विरार पोलिसांनी कारवाई केली आहे.
त्यांच्याविरोधात अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. विरारमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या २३ बांगलादेशींविरोधात धडक कारवाई करत पोलिसांनी अटक केली. अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अर्नाळा पोलिसांनी संयुक्त कारवाही करत बांगलादेशींना अटक केली.
विरारच्या अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरातून मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशींमध्ये १० महिला, १२ पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अटक केलेले सर्व बांगलादेशी विरार परिसरात भंगार विकण्याचे आणि मोलमजुरी करण्याचे काम करतात, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलिसांनी दिली आहे.