संचारबंदीसदृश स्थितीचा इम्रान यांचा दावा फेटाळला
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर तेथे संचारबंदी व निर्बंध लागू करण्यात आल्याचा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलेला दावा खोटा असून काश्मीर खोऱ्यातील जनजीवन उलट सुरळीत झाले आहे, असे जम्मू काश्मीर सरकारने बुधवारी म्हटले आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी आमसभेत केलेल्या भाषणात जे सांगितले ते सगळे खोटे होते. अर्धसत्य व खोटय़ा गोष्टी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून पाकिस्तान त्यांच्या दहशतवादी कारवायांवरून जगाचे लक्ष विचलित करून जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे,असे जम्मू काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरमध्ये संचालबंदी व निर्बंध लागू असल्याचा केलेला दावा सत्यापलाप करणारा असून केवळ मर्यादित निर्बंध तेथे लागू करण्यात आले आहेत. समाजकंटकांनी अशांतता निर्माण करू नये यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या असून उर्वरित निर्बंधही आठवडाभरात उठवण्यात येणार आहेत असे अधिकाऱ्याने सांगितले.