मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेही कोकणासाठी गाड्या सोडणार
मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वनेही गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे उशिरा का होईना चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडी रोड आणि कुडाळ स्टेशनपर्यंत गणपती स्पेशल ट्रेन धावणार आहेत. एकूण ५ विशेष ट्रेन सोडण्यात येणार असून २० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची कोंडी दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीने या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. दोन गणपती स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड, दोन गणपती स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनस ते सावंतवाडी रोड तर एक ट्रेन वांद्रे टर्मिनस ते कुडाळ दरम्यान धावणार आहे. या सर्व गाड्यांना विशेष प्रवासभाडे द्यावे लागेल. या गाड्यांचे आरक्षण उद्यापासून खुले होईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्या बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा या ठिकाणी थांबा घेत कोकणाकडे रवाना होतील व आठवड्यातून दोनदा धावतील असे नमूद करण्यात आले आहे. १७ ते ३० ऑगस्ट या दरम्यान या २० फेऱ्या होणार आहेत.