भारतीय महिलांची विंडीजवर मात, मालिकेतही २-१ ने बाजी
मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघावर मात करत मालिकेत बाजी मारली आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ६ गडी राखून विजय मिळवला. स्मृती मंधानाला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली. विंडीजच्या निम्मा संघ १०० धावांच्या आत माघारी परतला. यानंतर कर्णधार स्टेफनी टेलरचं अर्धशतक आणि अखेरच्या फळीत स्टेसी किंगने फटकेबाजी करत दिलेल्या साथीमुळे विंडीजच्या महिलांनी १९४ धावांपर्यंत मजल मारली. टेलरने ७९ धावा केल्या तर किंगने ३८ धावांची खेळी केली. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.