बोलतानाही मास्क तोंडावरच राहू द्या, हलगर्जीपणा करू नका: पणन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
सातारा । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक आहे, परंतु अनेकदा समोरच्या व्यक्तीशी बोलताना मास्क बाजूला केला जातो. अशावेळी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. तेव्हा बोलतानाही मास्क तोंडावर राहू द्या, याबाबत हलगर्जीपणा करू नका, असे आवाहन पणन व सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
कोरोना विषाणूची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात, महाराष्ट्रात कोरोनाची समस्या गंभीर झाली आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता याठिकाणी मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांतून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने लोक येतात. या लोकांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. काही ठिकाणी लॉकडाऊचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध शिथील झाले असले तरीही नागरिकांनी हात वारंवार धुवावे, सॅनिटाईज करावेत, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.