निर्बंध शिथिल तरी करोना प्रतिबंधक खबरदारी आवश्यकच ; लहान मुल, जोखीम गटासाठी तज्ज्ञांचा सल्ला
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून वाढीस लागलेली करोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात आली आहे.
पुणे | तिसऱ्या लाटेमुळे वाढलेली राज्यासह शहरातील करोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात आल्याने करोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले बहुसंख्य निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध नसले तरी लहान मुले आणि जोखीम गटातील नागरिकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन स्वयंशिस्तीने करणे आवश्यकच असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून वाढीस लागलेली करोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात आली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. शाळा आणि महाविद्यालयेही पूर्ण क्षमतेनुसार सुरु होत आहेत. मात्र, त्यामुळे महामारी संपली असे समजण्याचे कारण नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि जोखीम गटातील नागरिक यांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष करु नये असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत.
जनरल फिजिशियन डॉ. अविनाश म्हणाले, शहरातील रुग्णसंख्येत आता घट होत आहे. ही बाब समाधानकारक आहे. मात्र, रुग्णसंख्येतील घट साथ आटोक्यात आल्याचे दर्शवत नाही. ओमायक्रॉनचा प्रकार असलेल्या बीए-१ चा संसर्ग आटोक्यात येत आहे, मात्र बीए-२ या प्रकाराचा धोका कायम आहे. विषाणू आपल्या स्वरुपामध्ये बदल करत जीवंत राहण्याची धडपड करतो. त्यामुळे आता करोना संपला असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. लहान मुलांना शाळेत पाठवताना मुले, पालक यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, सहव्याधीग्रस्त रुग्ण यांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. बीए-१ आणि बीए-२ बरोबरच डेल्टाचा संसर्गही संपूर्ण संपलेला नाही, त्यामुळे गाफिल न राहणे सगळय़ात महत्त्वाचे आहे. बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग म्हणाले, शाळा सुरु होत असताना मुलांच्या प्रकृतीत विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नये. ज्या वयोगटासाठी लसीकरण उपलब्ध आहे त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे. शालेय आणि किशोरवयीन मुलांकडून संसर्ग घरातील ज्येष्ठांना संक्रमित होण्याची शक्यता असते.