बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात, नितेश राणेंचे वक्तव्य
मुंबई | महाईन्यूज
बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात असं वक्तव्य भाजपा नेते नितेश राणे यांनी केलं आहे. बाळासाहेबांच्या विचारावर पहिल्या अर्थाने जे चालत होते ते राजसाहेबच होते. कडवट शिवसैनिकांना विचाराल तर तेदेखील राज ठाकरेंचंच नाव घेतील. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी साजेसी आहे अशा शब्दांत नितेश राणे यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून भाषण करुन अंतरगं भगवा होत नाही असा टोला लगावलेला आहे.
“बाळासाहेब ठाकरेंची जयंती असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीही अभिवादन केलेलं नाहीये. या गोष्टी शिवसेना, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का ? अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे. “संजय राऊत काही बोलले तर दिल्लीवरुन फोन येतो आणि ते शब्द मागे घेतात,” असंही यावेळी ते म्हणालेले आहेत. शिवसेनेवर टीका करताना नितेश राणे यांनी म्हटलं की, “शब्दापलीकडे जाऊन कृतीतून तुम्ही काय करत आहात हे सर्वांना दिसत आहे. संजय राऊत सकाळी वेगळं बोलतात आणि संध्याकाळी वेगळं बोलतात. तुम्ही पारंपारिक मतदारांची फसवणूक करत आहात. महाविकास आघाडीत तुमची गळचेपी, अपमान होत असल्याचं दिसत आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना कुठे दिसणार नाही मग तेव्हा उद्धव ठाकरेंना कोणाचं किती भगवं राहिलं आहे हे कळेल”.