बांगलादेशी आणि रोहिंग्ये जर परत गेले नाहीत, तर गोळ्या घालाव्यात
- तेलंगणमधील भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान
हैदराबाद – देशात बेकायदेशीरपणे रहात असलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्ये जर आपल्या देशात परत जाणार नसतील, तर त्यांना गोळ्या घालण्यात याव्यात, असे प्रक्षोभक विधान तेलंगणमधील भाजप आमदार टी.राजा सिंह लोध यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आसाममधील खऱ्या भारतीयांची ओळख निश्चित करण्यामध्ये सुमारे 40 लाख अवैध बांगलादेशींना वगळण्यात आले आहे. त्यासंदर्भात लोध बोलत होते.
“जर बेकायदेशीरपणे भारतात राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्ये समजूतदारपेण् आपल्या देशामध्ये परत जाणार नसतील. तर त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. त्यांना गोळ्या घातल्या जायला हव्यात. तरच भारत सुरक्षित राहू शकेल.’ असे आमदार लोध हैदराबादमध्ये म्हणाले. अशा बेकायदेशीर रहिवाशांना काही अन्य देशांमधून गोळ्या घालून आणि हाकलून बाहेर काढण्यात आले आहे, असा संदर्भही त्यांनी दिला आहे.
1971 च्या सुमारास भारताने बांगलादेशची मदत केली आणि त्यानंतर मोठ्याप्रमाणावर बांगलादेशींनी आसाममध्ये घुसखोरी केली. आसाममध्ये 40 लाख घुसखोर अवैधपणे रहात आहेत. देशाचा सर्वनाश करण्याच्या कारस्थानांतर्गत हे घुसखोर आसाममध्ये अवैधपणे रहात असल्याचा आरोपही त्यांनी केला.