breaking-newsराष्ट्रिय

आसामी आणि भारतीय नागरीकांच्या हक्कांचे काय?

  • अमित शहा यांचा सवाल – विरोधकांना बांगला घुसखोरांचीच अधिक काळजी 

नवी दिल्ली – आसामात चाळीस लाख नागरीकांना तेथील अधिकृत नागरीकांच्या यादी बाहेर ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाचे विरोधकांनी संसदेत जोरदार भांडवल करून सरकारवर टीका केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की हे विरोधक बांगलादेशी घुसखोरांच्या मानवी हक्कांचा मुद्दा पुढे करीत आहेत पण तेथील मूळ आसामी व भारतीय नागरीकांच्या हक्‍कंचे काय असा सवाल त्यांनी केला आहे. विरोधकांना भारतीय नागरीकांपेक्षा बांगला घुसखोरांचीच अधिक काळजी आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

आसामातील मूळ मुस्लीम नागरीकांना भाजपचे सरकार घुसखोर ठरवून त्यांना देशाबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सरकारवर केला आहे. त्याचा अमित शहा यांनी जोरदार प्रतिवाद केला. ते म्हणाले की या घुसखोरांमुळे मूळ भारतीय नागरीकांचे हक्क हीरावले जात आहेत. त्यांच्या नोकऱ्या आणि शिक्षणाच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. राहुल गांधी यांचे नाव घेऊन त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने बांगला घुसखोरांविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सचा प्रकल्प कॉंग्रेसनेच सन 2005 साली सुरू केला पण तो पुर्ण करण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात 1985 साली झालेल्या आसाम करारानुसार हे नागरीकत्वाच्या छाननीचे काम सुरू करण्यात आले होते याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की या यादीतून ज्या भारतीय नागरीकाचे नाव वगळले गेले आहे त्यांना आपले नागरीकत्व सिद्ध करण्याची संधी पुन्हा दिली जाईल असेही त्यांनी नमूद केले व या संवेदनशील विषयावर राष्ट्रीय भावनेतून विरोधकांनी आपली भूमिका मांडावी असे आवाहन त्यांनी केले.

अमित शहा यांनी राज्यसभेत या विषयावर जोरदार भाषण केले पण त्यांच्या भाषणात विरोधकांनी अडथळे आणल्याने त्यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले होते. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button