फेक न्यूजमुळे सोशल मीडियावरचा लोकांचा विश्वास कमी होत आहे – प्रा. बानगुडे पाटील
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – “फेसबुक” आणि “व्हॉट्स ॲप”चा मारा लोकांवर सातत्याने होत आहे. यामुळे “फेक न्यूज”चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. “सोशल मिडीया”वरचा लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. भविष्यात वाचन व लोकसंवादाकडेच वळावे लागणार आहे”, असे प्रतिपादन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
शिवसेनेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय पश्चिम महाराष्ट्र विभागीय सडेतोड वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन बानगुडे पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे, आमदार गौतम चाबुकस्वार, बारामती संपर्कप्रमुख सत्यवान उभे, नांदेड संपर्कप्रमुख दीपक शेडे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, खडकवासला विधानसभा संघटीका भावना थोरात आदी उपस्थित होते.
प्रा. बानुगडे पाटील म्हणाले की, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सडेतोड वक्ते म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांनी कधीही बोललेला शब्द फिरवला नाही. हा त्यांच्या वक्तृत्वाचा खंबीर असा बाणा होता. वक्तृत्व हे नेतृत्व गुणाचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळे या स्पर्धांमधून चांगले वक्ते निर्माण होऊन शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणारे नेतृत्व निर्माण होण्यास मदत होणार आहे. फेसबुक आणि व्हॉट्स ॲपचा मारा लोकांवर सातत्याने होत आहे. यामुळे फेक न्यूजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे सोशल मिडीयावरचा लोकांचा विश्वास कमी होत आहे. भविष्यात वाचन व लोकसंवादाकडेच वळावे लागणार आहे.” वक्त्यांनी काय बोलू नये, हे नियम जरी पाळले तरी पुष्कळ झाले, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नगर या भागातील वक्ते असणाऱ्या ८८ शिवसैनिकांनी स्वयंस्फुर्तीने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी १८ विविध ज्वलंत विषय देण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धकास ५ मिनिटे व अधिक २ मिनिटे अशी ७ मिनिटाची वेळ देण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण लक्ष्मीकांत पांडे, प्रदीप मोरे, दीपक जाधव यांनी केले. हि वक्तृत्व स्पर्धा १४ व १५ नोव्हेंबर रोजी सायन्स पार्क हॉल, ऑटो क्लस्टर समोर, चिंचवड स्टेशन येथे संपन्न झाली.
स्पर्धेचे प्रास्ताविक शहर प्रमुख योगेश बाबर यांनी केले. चिंचवड विधानसभेचे संघटक संतोष सौंदणकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे यांनी केले. तसेच, युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात, राजू खांडभोर, अनंत कोऱ्हाळे ,रोमी संधू, संतोष सौंदणकर, अनिता तुतारे, शर्वरी जळमकर, ज्ञानेश्वर शिंदे,नितीन बोंडे, महेश बारसावडे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.