… पुन्हा निवडून येण्याची खात्री वाटत नाही, त्या लोकांचे पक्षांतर सुरु – केंद्रीयमंत्री रामदास आठवले
- कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांची साथ सोडू नये, आठवलेचा मिश्लिकी टोला
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राज्यात ज्यांना सत्ता हवी आहे आणि ज्यांना पुन्हा निवडून येण्याची खात्री वाट नाही. तेच लोक पक्षांतर करून भाजप, शिवसेनेत जात आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांची साथ सोडू नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.3) निगडीत व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेचे उद्घाटन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व कार्यक्रमासाठी आठवले शहरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे, नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर आदी उपस्थित होते. आठवले पुढे म्हणाले की, भाजप- शिवसेनेत गेलो. तर, आपली आमदारकी राहू शकते. त्यानंतर आपल्याला सत्ता मिळू शकते, अशी भावना असणे चुकीचे अजिबात नाही. भाजप त्यांना घेत आहे. अशा पद्घतीचे आरोप करण्यापेक्षा आपले लोक राष्ट्रवादीने सांभाळले पाहिजेत. मीच त्यांना सोडले आहे, मग बाकीचे तरी कसे राहतील, अशी मिश्कील टिपण्णीही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभर हवा आहे. जोवर मोदी आणि आपण आहोत, तोवर भाजप सत्तेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही एकत्र असून महायुतीचा 225 च्यावर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले. तरी, त्यांना फारशा जागा मिळणार नाहीत. 50 च्यावर त्यांचा आकडा जाणार नाही, असे भाकीत आठवले यांनी यावेळी केले. तर, सत्ता मिळो ना मिळो, परंतु, सत्तेचा वापर दीनदुबळ्यांसाठी व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना, मित्र पक्षाची युती निश्चित आहे. या दोन्ही पक्षाकडून मित्र पक्षाला 18 जागा मिळणार आहे. पुणे कॅन्टोमेंट व पिंपरी विधानसभेसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ने दहा जागांची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.