“नागरिकांनी सहकार्य केले नाही,तर बळजबरीने घरात बसवू”- तुकाराम मुंढे
कोरोना विषाणूच्या वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी देशभरातील नागरिकांना सरकार आणि प्रशासनाकडून घरी थांबण्याची विनंती करण्यात येत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, अशी विनंती वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरिही काही शहरात आजही लोक बाहेर पडत आहे. यासंदर्भातच नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना पुन्हा एकदा घरी थांबण्याची विनंती केली आहे. गांभिर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य केले नाही तर त्यांना घरी बसवण्यासाठी पुढचे पाऊल उचलावे लागेल, असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत स्वत: घरी बसून गंभीर रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे हाच एकमेव उपाय आपल्यासमोर आहे. लॉक डाऊनची परिस्थिती जनतेसाठीच नव्हे तर प्रशासनासाठीही चांगली नसते. विनाकारण गर्दी टाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. केवळ दुकाने बंद ठेवून प्रश्न सुटणार नाही. लोकांनीही विनाकारण गर्दी टाळायला हवी. जर नागरिकांनी सहकार्य केले नाही, तर त्यांना बळजबरीने घरात बसवू, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.