भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे,चिंताजनक परिस्थिती
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे…यासाठी केंद्र आणि राज्य सरकार त्यावर उपाययोजना करत आहेत. मात्र, आजचा आकडा काहीसा भीतीदायक आहे. काल देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २५८ वर होती. यामध्ये आज मोठी वाढ झाली आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. जगभरात आतापर्यंत ११ हजाराच्या वर कोरोनामुळे बळी गेले असून भारतात अद्याप चार जणांचा मृत्यू झालेला आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता असून आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याने देशासमोर धोक्याची घंटा वाजत आहे.
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर गेलेली आहे. तर एकाचा मृत्यू झालेला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आज ४० ने वाढली असून आकडा २९८ वर पोहोचला आहे. यामध्ये ३९ जण परदेशी नागरिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या जनता कर्फ्यू लागू केला असून घरातून एकाही व्यक्तीला कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे. तसेच महाराष्ट्र सरकारनेही पाऊले उचलली असून केवळ अत्यावश्यक दुकानेच सुरु राहणार आहेत.
बेंगळुरूमध्ये आज पालघरसारखाच प्रकार घडला. राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन कोरोनाचे स्टँप असलेल्या संशयितांना प्रवाशांनी पकडून रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे. यामुळे सर्व प्रवाशांना उतरवून कोचच सॅनिटाईज करण्यात आला आहे. तर उद्या तब्बल २४०० ट्रेन आणि १००० वर विमाने बंद ठेवण्यात येणार आहेत.