नागपूर मधील पुरग्रस्तांना मुख्यमंत्री यांच्याकडून 16.50 कोटी रुपयांची मदत
मुंबई: पूर्व विदर्भात प्रथमच पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पुरामुळे भंडारा, नागपूरस, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना फटका बसला आहे. या ठिकाणचे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले असून फार मोठे नुकसान झाले आहे. येथील परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर विभागातील पुरग्रस्तांना 16.50 कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केलेला आहे. ही रक्कम घरगुती सामान, कच्ची व पक्की घरे, मदत छावण्या यासाठी वापरली जाणार असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना सुद्धा प्रशासनाकडून 10 हजारांची मदत करण्याचे आदेश विजय वडेट्टीवार यांनी दिलेले आहेत. तर गेल्या 100 वर्षात प्रथम पूर्व विदर्भात अशी पुर परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होण्यासह शेतीचे सुद्धा फार मोठे नुकसान झालेले आहे. स्थानिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने आरोग्याविषयक चिंता सुद्धा व्यक्त केली जात आहे. मात्र प्रशासनाकडून येथील गावात निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूराची निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशातच मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीला पुर आलेला आहे. ऐवढेच नाही तर गोसेखुर्द प्रकल्पाची दार उघडून पूराच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने याकडे दुलर्क्ष केल्याने भंडारासह अन्य 56 गावांमध्ये पुराचे पाणी शिरलेले आहे.