नागपुरात विहीरीत पडलेला उंदीर काढण्याच्या प्रयत्नात तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर – सर्वत्र तान्ह्या पोळ्याचा आनंदोत्सव सुरू असताना शेतामधील विहिरीत पडलेला उंदीर काढण्याच्या प्रयत्नात तीन मजुरांचा विहिरीत गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील वाकेश्वर या गावात घडली.
मौदा तालुक्यातील वाकेश्वरमध्ये काल दुपारनंतर घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेतील मृत मजुरांची नावे आकाश भोजराज पंचबुद्धे (२७) विनोद प्रभू बर्वे (३७) आणि गणेश मुन्नीलाल काळबांडे (२८) अशी आहेत. हे सर्वजण वाकेश्वर गावातील रहिवासी होते. तिघेही मजूर एका शेतात सल्फेट मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातील विहिरीत त्यांना एक उंदीर व बेडूक दिसला. ते काढण्यासाठी एक मजूर हा विहिरीच्या लोखंडी अँगलच्या आधारे विहिरीत उतरला. परंतु तो बाहेर येत नसल्याने त्याला काढण्यासाठी दुसरा विहिरीत उतरला. परंतु दोघेही वर न आल्याने तिसराही विहिरीत उतरला. अशाप्रकारे तिघेही विहिरीत उतरले. मात्र विहिरीत विषारी वायू असल्यामुळे तिघांचाही श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अरोली पोलीस तपास करत आहेत.