नमाजासाठी राजभवनाची मशीद उघडा; रजा अकादमीची राज्यपालांकडे मागणी
मुंबई – राज्यात धार्मिकस्थळं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रजा अकादमीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्रं लिहून राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची विनंती केली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
23 मार्चपासून राज्यातील सर्वच धार्मिकस्थळं बंद होती. 16 नोव्हेंबर रोजी पुन्हा धार्मिकस्थळं सुरू करण्यात आली. त्यामुळे रजा अकादमीचे महासचिव सईद नूरी यांनी राज्यपालांना एक पत्रं लिहून राजभवनातील मशीद नमाज पठणासाठी सुरु करण्याची विनंती केली आहे. राजभवनातील कर्मचारी राजभवनातील मशिदीत सामान्य लोकांना नमाज पठणासाठी येऊ देत नाही. आता धार्मिकस्थळं उघडी करण्यात आल्याने या सर्वसामान्य जनतेला नमाज पठणाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
राजभवनात मस्जिद नाहीच
राजभवनातून याबाबतच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजभवनमध्ये मशीद नाही. मात्र, मुस्लिम कर्मचाऱ्यांना नमाज पठण करता यावं म्हणून स्टाफ क्वार्टरमधील एक रुम उघडी करून देण्यात आली होती. त्यामुळे इतर सामान्य लोकही या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी येत होते. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. परंतु, कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातील धार्मिकस्थळं उघडण्यात आली असून सर्वच धार्मिकस्थळांच्या कमिटीने या धार्मिकस्थळांच्या ठिकाणी कोरोना नियमाचं काटेकोर पालन करण्यावर भर दिला आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझिंग आणि तोंडाला मास्क लावणे या गोष्टींची धार्मिकस्थळांच्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवाय भाविकांना ऑनलाइन बुकींग नंतरच दर्शन देण्याची सुविधा देण्यात येत आहे. मात्र, अनेक धार्मिकस्थळांच्या ठिकाणी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केल्याने काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचं चित्रं दिसत आहे.