देशात २४ तासांत ७४,३८३ नवे कोरोना रुग्ण
- भारताने ७० लाखांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. दररोज 70 ते 80 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 74 हजार 383 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 918 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या 70 लाख 53 हजार 807 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 08 हजार 334 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 60 लाख 77 हजार 977 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 8 लाख 67 हजार 496 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 8 राज्यांमध्ये 48 टक्के रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यात महाराष्ट्रातील 15 जिल्हे, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरातमधील प्रत्येकी दोन जिल्हे आणि पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका जिल्ह्याचा समावेश आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यासह 10 राज्ये अशी आहेत जिथे कोरोनाचे 77 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.