देशातील तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत विकास पोचविण्याचे स्वप्न अटलजींनी पाहिले – महापौर उषा उर्फ माई ढोरे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी देशासाठी केलेले कार्य मोठे होते. त्यांनी देशातील तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत विकास पोचवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष अण्णा लोंढे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
अटलजींचे विचार, त्यांच्या कविता, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे राजनैतिक कौशल्य हे नेहमीच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करणारे आहे. भारतीय राजकारणातील एक मोठे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. संसदेत विरोधकही त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी उत्सुक असत. पाच दशक राजकारणात सक्रिय असलेले वाजपेयी भारतीय लोकशाहीच्या उत्तम परंपरेचे प्रेरणास्थान होते. लोकशाहीची वास्तविकतावादाच्या मर्यादेचे रूपक स्वरुप म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. भाजपचे संस्थापकांमध्ये समाविष्ठ असलेले अटल बिहारी वाजपेयी केवळ एक प्रखर वक्ताचं नव्हते तर एक कवी म्हणून लोकप्रिय होते, असे मत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी केले.