‘दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू होणार’, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं नाही. ऑनलाईन पद्घतीने शाळा सुरू असल्या तरीही शाळा केव्हा सुरू होणार याकडे समस्त पालकवर्गाचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यातील शाळा दिवाळईीनंतर सुरू करण्याचा विचार आहे असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसेच, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतही उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
राज्य सरकार कोरोनाचे प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत आधी विचार होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट आहे. तरीही अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयं सुरु होण्यास थोडा वेळ लागतो आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाककरे बैठक घेणार असून ते विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
लॉकडाउन सुरु केल्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शालेय शिक्षणाचे वर्ष १५ जूनला ऑनलाइन पद्धतीने सुरु झाले. मात्र शाळा सुरु झाल्या नाहीत. आता दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.