..तर ‘शोले’च्या रिमेकमध्ये शरद पवारांना गब्बरची भूमिका दिली असती
मकरंद अनासपूरे सूत्रसंचालन करत असलेला ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा चॅट शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमात हजेरी लावत असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील माहीत नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर येत आहेत. या आठवड्यात नेते रामदास आठवले आणि गायक आनंद शिंदे हजेरी लावणार आहेत. या दोघांनी मकरंद अनासपुरेशी दिलखुलास गप्पा मारल्या.
रामदास आठवले हे उत्स्फुर्त कवी आहेत हे सर्वश्रुत आहे. या कविता कशा सुचतात आणि त्याची सुरुवात कुठून झाली याबद्दल आठवलेंनी कार्यक्रमात सांगितलं. आठवले आणि आनंद शिंदे यांनी बेधडक आणि खुसखुशीत पद्धतीने दिलेल्या उत्तरांमुळे हा एपिसोड नक्कीच खास ठरणार आहे.
यावेळी मकरंदने आठवले यांना ‘शोले’ या चित्रपटाचा रिमेक झाल्यास त्यात कोणत्या राजकारणी व्यक्तीला कोणती भूमिका देणार असा गमतीशीर प्रश्न विचारला. त्यासोबतच तुम्हाला त्यात कोणती भूमिका साकारायला आवडेल असंही त्याने विचारलं. यावर उत्तर देताना आठवले म्हणाले, ‘मी अमिताभ बच्चन यांनी साकारलेली जयची भूमिका घेईन तर उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र यांची विरूची भूमिका साकारली असती. शरद पवार यांनी गब्बर सिंगची भूमिका साकारली असती.’
हा संपूर्ण भाग गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी प्रसारित होणार आहे.