टोपी आणि शिट्टी देतो, देशाची चौकीदारी करा, अकबरुद्दीन ओवेसींचीं मोदींवर टीका
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील वक्तव्यांमुळे आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवताना दिसत आहेत. आता एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी कोण आहेत. कधी ते चहावाला बनतात, आता ते दुसऱ्या रूपात दिसत आहेत. या निवडणुकीच्या बरोबर आधी ते चौकीदार बनले आहेत. आता त्यांना टोपी आणि शिट्टी देतो, त्यांनी चौकीदारी करावी, असे वक्तव्य ओवेसी यांनी जाहीर सभेत केले.
ते पुढे म्हणाले, चहावाला बनून त्यांनी देशाची दिशाभूल केली. आता चौकीदार बनून पुन्हा ते तेच काम करत आहेत. मोदी जेव्हा चहावाला झाले. त्यावेळी मी म्हटले होते की, चहाची किटली, चुल मी देईन, चहा त्यांनी बनवून आम्हाला द्यावा. मोदी असे व्यक्ती आहेत, जे कधी नाल्यातील गॅसवर पकोडे बनवतात. आता ते चौकीदार झाले आहेत. मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन. मोदींनी टोपी आणि गळ्यात शिट्टी बांधून देशाची चौकीदारी करावी.