‘जे बाणेदार वचन दिलं, त्याच काय झालं?’ शेलारांची शिवसेनेच्या ‘त्या’ आश्वासनावरून टीका
भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ‘जे बाणेदार वचन दिलं, त्याच काय झालं?,” असा सवाल शिवसेनेला केला आहे. मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.
भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी यावरूनच शिवसेनेला सवाल केला आहे. “सुटलेला बाण आणि दिलेला वचनाचा शब्द परत घेता येत नाही, असे म्हणतात. मग, मुंबईकरांना 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे जे “बाणेदार वचन” दिले त्याचे काय झाले? टाटा, जावई, मुलाला वाटून झाले असतील तर आता आमच्या सामान्य मुंबईकरांची आठवण येऊ द्या!,’ असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.