जडेजा दुखापतग्रस्त नाहीच – एमएसके प्रसाद
नवी दिल्ली- ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय अंतिम अकरा संघाची घोषणा करण्यात आली. या संघात भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाचा समवेश करण्यात आला आहे. मात्र, पर्थ कसोटीत संघात जडेजाला समाविष्ट करुन घेतले नव्हते त्याबद्दल बोलताना प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तो फिट नसल्याने त्याला संघात स्थान मिळाले नाही असे सांगितले होते. मात्र, त्यावर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी खुलासा करत जडेजा शंभर टक्के फिट असल्याचे सांगितताना त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी निवडले तेंव्हा तो दुखापतग्रस्त नव्हता असे विधान केले आहे.
दुसऱ्या कसोटीत भारताला एका स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाजाची कमतरता भासली होती. यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जडेजा संघात असतानाही त्याला दुसऱ्या कसोटीत का खेळवले नाही? या प्रश्नांची सरबत्ती व्हायला लागल्यावर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तो शंभर टक्के फिट नसल्याने सांगितले होते. रवी शास्त्रींनी जडेजा आस्ट्रेलियात येण्यापूर्वी खांदा दुखावल्याने त्याच्यावर उपचार घेत होता. त्यामुळे तो सामन्यासाठी संपुर्णपणे फिट नसल्याने आम्ही त्याला खेळवले नाही. असे वक्तव्य केले होते. यामुळे जर दौऱ्यावर येतानाच जडेजा फिट नव्हता तर त्याला संघात घेण्यातच का आले अशी टीका झाली.
या टीकेला आज निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी उत्तर दिले. त्यांनी जडेजा हा शंभर टक्के फिट होता. म्हणूनच त्याची निवड केली असे सांगितले. ते म्हणाले निवड समिती बैठकीच्या आदल्या दिवशी आम्हाला सर्व खेळाडूंच्या फिटनेसचा अहवाल दिला जातो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघ निवडताना आम्हला मिळालेल्या अहवालात जडेजा शंभर टक्के फिट असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच संघ निवड झाल्यानंतर झालेल्या रणजी करंडकाच्या रेल्वे विरुद्धच्या सामन्यात त्याने जवळपास 60 षटके टाकली होती. त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित करणे अयोग्य आहे.