कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा भारत दौरा पुढे ढकलला
नवी दिल्ली – सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित इंग्लंड संघाचा भारत दौरा दोन्ही क्रिकेट बोर्डांनी पुढे ढकलला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अधिकारी २०२१ साली जानेवारी महिन्याच्या अखेरीस इंग्लंडचा दौरा आखण्याच्या तयारीत आहेत. याव्यतिरीक्त २०२१ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणेही अपेक्षित आहे.
“ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यानंतर आम्ही आता इतर क्रिकेट बोर्डांशी नियोजीत दौऱ्यांबद्दल चर्चा करुन निर्णय घेऊ शकतो. सध्याच्या घडीला कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता दौरा करणे अशक्य आहे. यासाठी भारताचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे . बीसीसीआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरच याबद्दल माहिती देण्यात येईल.” इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टॉम हॅरिसन यांनी माहिती दिली. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही २०२१ मध्ये इंग्लंडचा भारत दौरा नव्याने आखण्याबद्दल चर्चा सुरु असल्याचे सांगितले.