कोकणातील चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 1 हजारापेक्षा जास्त बसगाड्या आरक्षित
गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या १ हजारापेक्षा जास्त बसगाडय़ा आरक्षित करण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करत एसटीतर्फे प्रवासी वाहतूक केली जात आहे.
अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावाला सुखरुप जाता यावे. यासाठी एसटी महामंडळाने जादा बसगाडय़ा सोडल्या होत्या. आता मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातून येण्यासाठी १ हजार १४८ गाडय़ा आरक्षित केल्या असून त्यापैकी ३४६ बसेसचे गट आरक्षण झाले आहे तर, ३६६ गाडय़ांचे व्यक्तिगत आरक्षण झाले आहे. याबरोबरच उर्वरित ४३६ बसगाडय़ा अंशत: आरक्षित झाल्या आहेत. या प्रवासासाठी पूर्वीचेच भाडे कायम ठेवण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके, तसेच बसथांब्यांवर एसटीचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच, कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहेही उभारण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.