breaking-newsआंतरराष्टीय
भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचा पाकिस्तानचा कांगावा
इस्लामाबाद : भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा कांगावा पाकिस्तानने केला असून, त्याप्रकरणी भारताचे उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांच्यावर समन्स बजावले. भारताच्या गोळीबारात एक महिला ठार झाल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.
दक्षिण आशिया आणि सार्कचे महासंचालक मोहम्मद फैझल यांनी अहलुवालिया यांना पाचारण करून भारताने केलेल्या शस्त्रसंधीबद्दल त्यांच्याकडे आपला निषेध नोंदविला. भारताने चिरिकोत क्षेत्रात केलेल्या गोळीबारात ६९ वर्षांची एक महिला ठार झाली, तर अन्य तीन नागरिक जखमी झाले, असे फैझल म्हणाले.
भारताकडून २०१७ पासून शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन होत आहे, भारताकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा कांगावाही पाकिस्तानने केला आहे.