कॉंग्रेसने देशाच्या अर्थकारणाची पुरती वाट लावली
नवी दिल्ली – कॉंग्रेसने देशाच्या अर्थकारणाची पुरती वाट लावली असा आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की युपीए सरकारच्या काळात देशाच्या आर्थिक स्थितीचा बोजवार उडाला आहे याची आम्हाला कल्पना होती. पण प्रत्यक्षात आम्ही सत्तेवर आल्यानंतर जेव्हा अंदाज घेतला तेव्हा देशाची आर्थिक स्थिती कल्पनेच्याही पलिकडे बिघडली होती. केवळ देशाची इभ्रत राखण्यासाठी आम्ही ही बाब उघड केली नाही असे त्यांनी म्हटले आहे. युपीए सरकारच्या काळातील अर्थसंकल्पातल्या काहीं आकड्यांबाबतही शंका निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
मोदी म्हणाले की या साऱ्या स्थितीवर श्वेत पत्रिका काढण्याचा आमचा विचार होता पण अशी श्वेत पत्रिका काढून देशाच्या दयनिय स्थितीची माहिती आम्ही उघड केली असती तर देशाच्याच एकूण अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम झाला असता म्हणून आम्ही गप्प बसलो. अशा वेळी आमच्यापुढे दोनच मार्ग होते. त्यावर राजनिती करायची किंवा राष्ट्रनितीने हा विषय हाताळायचा.
आम्ही जबाबदार राज्यकर्ते या नात्याने राष्ट्रनितीने या विषयाचा निपटारा करण्याच निर्णय आम्ही घेतला असे ते म्हणाले. आम्हाला या विषयावर राजनिती करणे अधिक सोयीचे आणि सोपे गेले असते. वृत्तपत्रांनाहीं मोठ्या बातम्या मिळाल्या असत्या असे त्यांनी नमूद केले. पण त्यातून परिस्थिती आणखीनच चिघळली असती असेही मोदी म्हणाले.