काँग्रेसचा घणाघात : ‘अब की बार’ महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार!
नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
देश आर्थिक संकटात सापडलेला असतानाच महागाईनेही उसळी घेतली आहे. अन्नधान्यापासून दैनंदिन वापरातील वस्तू मोठ्या प्रमाणावर महागल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आज काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
काही वर्षांपूर्वी ‘अबकी बार महंगाई पर वार’ म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाढत्या महागाईच्या प्रश्नावर गप्प बसले आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. महागाईच्या प्रश्नावर मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार नाकर्ते झाले आहे. देशातील जनता महागाईने होरपळत असताना ना मोदी काही उत्तर देत आहेत, ना भाजपाकडून काही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
”आतातर देशात देशात शाकाहारी होणेसुद्धा अपराध बनले आहे. भाजीपाला, खाद्यपदार्थांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भात, गहू, साखर, भाजीपाला, खाद्यतेल असे सर्वच पदार्थ महागले आहेत. 2014 मध्ये कांद्याचा दर 8 रुपये प्रतिकिलो होता तो आज 85 रुपये झाला आहे. टोमॅटोचा दर 14 रुपये किलो होता, तो आज 39 रुपये किलो झाला आहे. 2014 मध्ये बटाटे 8 रुपये किलो होते ते 29 रुपये किलो झाले आहेत. लसुणीचा दर 290 रुपये प्रतिकिलो झाला आहेत,” असे सांगत सुरजेवाला यांनी महागाईची आकडेवारीच माध्यमांसमोर मांडली. त्यामुळे भाजपला आता कोणता पलटवार करणार याकडे लक्ष लागले आहे.