डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारात पुण्याची भूमिका ऐतिहासिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
इनोव्हेशन आणि स्टार्टअपमध्ये जगात भारताची नवी ओळख
पुणे: जगभरातील लोक भारताच्या विकासाची चर्चा करीत आहेत. या विकासाचा लाभ महाराष्ट्राला आणि पुणे शहराला देखील होत आहे. देशाने मागील काही वर्षात इनोव्हेशन आणि स्टार्टअपमध्ये जगात नवी ओळख बनवली आहे. देशात एक लाख पेक्षा अधिक स्टार्ट अप आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे हे शक्य झाले आहे. त्यात पुणे शहराची ऐतिहासिक भूमिका राहिली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारलेल्या सुमारे चार हजार घरांचे लोकार्पण आणि पीएमआरडीए कडून भविष्यात साडेसह हजार पेक्षा अधिक बांधल्या जाणाऱ्या घरांची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ऑगस्ट महिना उत्सव आणि क्रांतीचा महिना आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच पुण्यात येण्याचे सौभाग्य मिळाले. पुणे शहराचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे. पुण्याने टिळकांसह अनेक नेते भारताला दिले आहेत. अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. ते महान समाजसुधारक होते. आज मोठ्या संख्येने विद्यार्थी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर संशोधन करीत आहेत. त्यांचे कार्य आजही आम्हाला प्रेरित करत आहे.
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प चांगला…
देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवकांचे स्वप्न पूर्ण करणारे पुणे हे एकमेव शहर आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे मेट्रोच्या माध्यमातून जोडली गेल्याने याचा नागरिकांना फायदा होईल. उद्घाटन झालेल्या घरांच्या माध्यमातून अनेकांना घरे उपलब्ध होतील. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प चांगला आहे, असे कौतुक मोदी यांनी केले.
वाहतूक सेवा बळकट करणे आवश्यक…
मध्यमवर्गाची जीवनशैली सुधारण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. पुणे सारख्या शहरातील मध्यमवर्गीय लोकांची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न करणार. पुणे मेट्रोचा शिलान्यास माझ्या हस्ते झाला. पहिल्या टप्प्याचे आणि आता दुसऱ्या टप्प्याचे देखील उद्घाटन होत आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेला बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे.
मेट्रोचे जाळे वाढवणार…
सन 2014 पर्यंत 250 किलोमीटर पेक्षा कमी मेट्रो देशात होती. आता 850 किलोमीटर पेक्षा अधिक मेट्रो मार्ग तयार झाला आहे. एक हजार किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. 2014 पूर्वी केवळ पाच शहरात मेट्रो होती. आता 20 पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सुरु आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर येथे मेट्रो सुरु झाली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो आवश्यक आहे. मेट्रोचे जाळे वाढविण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहेत.
स्वच्छता हा चांगल्या जीवनशैलीचा गुण…
शहरातील स्वच्छता हे देखील चांगल्या जीवनशैलीचा गुण आहे. स्वच्छ भारत अभियान हे केवळ शौचालयांच्या स्वच्छतेपुरते मर्यादित नाही. कचरा कमी करणे काळाची गरज आहे. कचऱ्याचे ढीग हटविण्यासाठी काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवडचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प खूप उपयुक्त आहे. यामुळे विजेची निर्मिती होईल आणि प्रदूषण देखील कमी होईल. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडून महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला जात आहे. सन 2014 च्या पूर्वीच्या तुलनेत रेल्वे विकासात 12 पटींनी अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना शेजारील राज्यांना जोडण्याचे काम सुरु आहे.