कंपन्यांचा प्राप्तिकर कमी केल्याने भारतात गुंतवणूक वाढणार
भारताने अलीकडेच कंपन्यांचा प्राप्तिकर कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे तेथील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. भारताच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवताना नाणेनिधीने सांगितले,की हा निर्णय योग्यच असला तरी भारताने आर्थिक मजबुती वाढवली पाहिजे. आर्थिक घटकांबाबत दीर्घकालीन स्थिरता प्राप्त केली पाहिजे.
नाणेनिधीच्या आशिया- पॅसिफिक विभागाचे संचालक चँगयोंग यांनी सांगितले,‘भारताकडे आर्थिक अवकाश फार कमी आहे, त्यामुळे सावध राहिले पाहिजे. कंपनी प्राप्तिकर कमी करण्याच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होणार असला तरी आर्थिक मजबुतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’
भारतात गेल्या दोन तिमाहीत आर्थिक वाढीचा दर कमी झाला असून तो ६.१ होता, पण २०२० मध्ये तो पुन्हा ७ टक्के होईल, असे सांगून ते म्हणाले,की पत धोरणातून मिळालेले प्रोत्साहन व कंपनी प्राप्तिकरातील कपात यामुळे गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.आशिया पॅसिफिक विभागाच्या उप संचालक अॅनी मेरी गुल्ड वुल्फ यांनी सांगितले,की भारताने आता बँकेतर आर्थिक क्षेत्रांकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारी बँकांचे फेरभांडवलीकरण करण्यात आले असून बँकेतर संस्थांचे प्रश्न प्रलंबित आहेत. बँकेतर संस्थांच्या कर्ज देण्याच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.