औरंगाबादचे ‘संभाजी नगर’ असे नामकरण झालेच पाहिजे – विकास पासलकर
पुणे | प्रतिनिधी
अन्याय अत्याचाराच्या आणि गुलामीच्या स्मृती जतन करण्यापेक्षा आपला गौरवशाली, उज्वल वसा वारसा जपण्यासाठी औरंगाबादचे संभाजी नगर असे नामकरण झालेच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारने निर्णय घ्यावा. त्याला संभाजी ब्रिगेडचे संपूर्ण समर्थन असेल, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केले.
शिवप्रेमींच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या 341 व्या राज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी पुणे महापालिकेचे सहआयुक्त संदीप कदम, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी अधिकारी भैय्यासाहेब देशमुख, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, मयूर शिरोळे, मंदार बहिरट, सचिन जोशी, मराठा टायगर फोर्सचे संदीप लहाने पाटील, सोमनाथ काळे आदी उपस्थित होते.
विकास पासलकर म्हणाले की, बारा मावळातील सप्तनद्यांच्या जलाने छत्रपती संभाजी महाराजांना अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी इंग्रजी भाषेतून संवाद साधणारे संभाजी राजे युवकाना समजले पाहिजे. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून चार ग्रंथ लिहिणारे संभाजी राजे आपल्या युवकांना समजले पाहिजे. संभाजी राजांजी विद्वत्ता इतकी मोठी होती की काशीवरून आलेल्या गागा भट्टाने समनयन नावाचा ग्रंथ संभाजी राजांना अर्पण केला. तेव्हा त्यांच वय अवघे 18 वर्षांचे होते. अशा गुणसंपन्न राजाच्या नावाने जे संघटन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभे आहे. त्या संभाजी ब्रिगेडचे आम्ही पाईक आहोत. याचा आम्हाला अभिमान असल्याचे विकास पासलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रतिपादन केले.
या प्रसंगी पुणे महापालिकेचे सहआयुक्त संदीप कदम यांनी जनतेला संभाजीराजे राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार बहिरट, सचिन जोशी, मयुर शिरोळे, श्रेयस खोपडे यांनी सहकार्य केले. संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर विराज तावरे यांनी आभार मानले.