भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
मुंबई – भाजप इतर राज्यांप्रमाणे येथेही आमदार पळवेल असे वाटत होतं. पण, तसे होणार नाही. भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असा गाैप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांत आमच्याकडून अनेक आमदार आमच्याशी संपर्क साधत आहेत. आमच्याकडून चूक झाल्याचे सांगत आहेत. खासगीत सगळेच कबूल करत आहेत. अशा आमदारांना परत यायचे झाले तर त्याठिकाणच्या निष्ठावंतांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल. कोणतेही प्रकल्प थांबणार नाहीत, भाजपकडून जो गैरसमज पसरविण्यात येत आहे तसे काही होणार नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रकल्प करू.
किमान समान कार्यक्रमावर आमची बैठक झाली असून, वरिष्ठ नेत्यांना या बाबतचा अहवाल दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व घटकांना सामावून घेणारे यामध्ये मुद्दे आहेत. आजच यावर चर्चा करणे योग्य नाही. भाजपकडे 105 जागा आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे काही गोळा केल्या आहेत. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावे. आम्हाला पाच वर्षे सरकार टिकवायचे आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे थोडासा वेळ लागेल, असे पाटील यांनी सांगितले.