एप्रिल ते जून या 3 महिन्यात 30.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार ?
संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कोरोना विषाणूमुळे लोकांच्या नोकरी जाणार असल्याचा अंदाज पुन्हा एकदा वर्तवला आहे. या संघटनेनुसार एप्रिल ते जून या अवघ्या तीन महिन्यातच सुमारे ३०.५ कोटी लोकांच्या पूर्णवेळ नोकऱ्या जाणार आहेत. यापूर्वी या संघटनेने प्रत्येक आठवड्यातील ४८ तासांची पूर्णकालिक नोकरी असलेल्या १९.५ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या या विषाणूमुळे लॉकडाऊन वाढवला जाणार आहे. त्यामुळे या संघटनेला पुन्हा एकदा आपल्या अहवालात बदल करावा लागला आहे.
संघटनेने म्हटले की, या विषाणूमुळे अनौपचारिक क्षेत्रातील १.६ अब्ज कामगारांसमोर संकट उभं राहिलं आहे. कारण या महामारीमुळे कमावण्याचे साधनच बंद झालेले आहेत.
भारताबाबत सांगायचं म्हटलं तर कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा दर वाढून २३.४ वर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (सीएमआयईच्या) अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे भारताच्या शहरी बेरोजगारीचा दर ३०.९ टक्के पर्यंत वाढू शकतो. तर एकूण बेरोजगारी २३.४ टक्केपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या अहवालावरुन स्पष्ट होते की, कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट होणार आहे.