‘आमच्यात अविश्वासाचा वातावरण…’
- दिल्लीतील आयएएस अधिकाऱ्यांची तक्रार
नवी दिल्ली – दिल्ली सरकारमधील आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने आज पहिल्यांदाच एक पत्रकार परिषद घेऊन सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या संबंधात आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले आहे की आम्ही संपावर गेलेलो नाही आम्ही आमची कामे करीत आहोत. आमच्यात प्रशासनाविषयी अविश्वासाचे वातावरण असून तो अविश्वास दूर करण्याचा प्रयत्न कोणीही करीत नाही अशी तक्रार त्यांनी केली आहे.
आयएएस अधिकारी दिल्ली सरकारमधील मंत्र्यांच्या बैठकांना उपस्थित राहात नाहीत, मंत्र्यांचे फोन घेत नाहीत त्यामुळे कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याची तक्रार करीत केजरीवालांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे त्याविषयी विचारले असता राज्यातील एक ज्येष्ठ अधिकारी मनिषा सक्सेना यांनी सांगितले की घटनात्मक स्वरूपाच्या बैठकांना आम्ही उपस्थित राहतो परंतु नियमीत स्वरूपाच्या बैठकांना आम्ही उपस्थित राहात नाहीं. जिथे आम्हाला असुरक्षित वाटते किंवा जिथे आमचा सन्मान राखला जात नाहीं तेथे आम्ही उपस्थित राहात नाही असे त्या म्हणाल्या.
दिल्लीतील प्रदुषणा बाबत पर्यावरण मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या बैठकीला पर्यावरण खात्याचे सचिवच उपस्थित नव्हते त्याविषयी विचारले असता संबंधीत अधिकाऱ्यांनी ही बैठक अत्यंत अल्पावधी आयोजित करण्यात आल्याचे कारण दिले. त्यांच्याकडे केवळ तेवढे एकच काम नाही. त्यांच्या आधीच्याही काही बैठक ठरल्या होत्या त्यामुळे त्यांना तेथे जाता आले नाही असेही त्यांनी नमूद केले.