केजरीवाल यांचे धरणे म्हणजे राजकीय स्टंट – मनोज तिवारी
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद् केजरीवाल यांचे धरणे राजकीय स्टंट असल्याची टीका दिल्ली भाजपाने केली आहे. सन 2019 च्या निवडणुकांसाठे भाजपाविरोधी आणि नरेंद्र मोदी विरोधी एक फळी उभी करण्यसाठी केजरीवाल यांचा हा स्टंट चालू असून त्याला चार राज्यांचे मुख्यमंत्री साथ देत आहेत ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी दिल्ली भाजपाचे प्रमुख मनोज तिवारी यांनी टीका केली आहे. केवळ राजकीय फायद्यांवर नजर न ठेवता आपल्या मंत्र्यांसह कामकाज सुरू करावे असे विजेंद्र गुप्ता यांनी केजरीवाल यांना दिलेल्या एका खुल्या पत्रात आवाहन केले आहे. गुप्ता हे दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते असून त्यांनी दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे. तुमचे हे धरणे म्हणजे भाजपाविरोधी आणि नरंद्र मोदीविरोधी स्टंट आहे, हे चार मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेने नि:संशयपणे दाखवून दिले आहे, असे गुप्ता यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केजरीवाल यांना त्यांच्या काही मंत्र्यांसह भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना परवानगी देण्यात आली नाही. ईदनिमित्त निती आयोगाची बैठक पुढे ढकलावी अशी मागणी करणाऱ्या ममता बॅनर्जी धरण्यासारख्या मामूली राजकीय स्टंटसाठी पश्चिम बंगाल सोडून दिल्लीत आल्या आहेत, असे मनोज तिवारी यांनी ट्विट केले आहे. या चार मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना धरणे सोडून दिल्लीच्या जनतेपुढील समस्या सोडवण्याचा सल्ला द्यावा असे आवाहन केले होते, परंतु ते केजरीवाल याच्या स्टंटमध्ये सहभागी झाले आहेत, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट असल्याचे तिवारी यांनी पुढे ट्विट केले आहे.